Panjab dakh ; संपूर्ण महाराष्ट्रावर अतीव्रुष्टीचे ढग, आज या जिल्ह्यात सुरुवात..
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केरळमधील कोची शहरातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २७, २८ आणि २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. पावसाला सुरुवात आज, २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासूनच विदर्भाकडील जिल्ह्यांमध्ये होणार आहे, ज्यात चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी आणि नांदेड या भागांचा समावेश आहे. हा अंदाज राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबरला हा पाऊस पुढे सरकत मराठवाड्याच्या दिशेने जाईल, यात नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर (औरंगाबाद), अहिल्यानगर (अहमदनगर), बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश असेल. त्यानंतर, २८ आणि २९ सप्टेंबरच्या दरम्यान हा पाऊस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे वळेल. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, कोकणपट्टी, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपली कामे आज दुपारपर्यंत करून घ्यावी आणि काढनी केलेली पिकं झाकून ठेवावे.
शेतकऱ्यांना ईशारा ; panjab dakh
ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे, त्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत थांबून त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन काढणी करावी, असे आवाहन डख यांनी केले आहे. यासोबतच, त्यांनी महत्त्वाचा इशाराही दिला आहे. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी जास्त पाऊस पडणार असल्याने, नदीकाठी किंवा तलावांच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
या काळात विजेचे प्रमाण आणि वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
मान्सून माघार घेनार…
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, राज्यामध्ये पावसाचा जोर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ओसरणार आहे आणि पाऊस माघार घेण्यास सुरुवात करेल.