महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या मार्गावर, वातावरणात बदल… रामचंद्र साबळे यांचा अंदाज
महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ झाली असून, आजपासून शनिवारपर्यंत (ता.१२ ते १८) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. त्यामुळे बाष्पयुक्त वारे अत्यंत कमी प्रमाणातच महाराष्ट्राच्या दिशेने येतील. त्यानुसार राज्यात पूर्णपणे उघडीप राहून पावसाची शक्यता नसेल. मध्य व पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता कमी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ढगांचे प्रमाणही अत्यल्प राहील. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश व कमाल तापमानात वाढ होणे शक्य आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगही सर्वच जिल्ह्यांत साधारणच राहील. अस्थिर हवामानाकडून स्थिर हवामानाकडे वाटचाल झाली आहे असे रामचंद्र साबळे म्हनाले.
मान्सूनची माघार लवकरच
काश्मीर, पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात या राज्यांतून मॉन्सून बाहेर पडला असून, पश्चिम उत्तर प्रदेश व पश्चिम मध्य प्रदेशातून मॉन्सून बाहेर पडल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले आहे. भारताच्या पूर्व भागातून उत्तरेकडून दक्षिणेकडे ईशान्य मॉन्सून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
हवेच्या दाबात वाढ झाल्याने तो आता वेगाने बाहेर पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हवामान अत्यंत अनुकूल बनले आहे. किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, थोड्याच दिवसांत थंडीची चाहूल सुरू होईल…