मोठी बातमी!..हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा, एवढ्या शेतकऱ्यांना फायदा

मोठी बातमी!..हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा, एवढ्या शेतकऱ्यांना फायदा

 

राज्यातील शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३५ हजार ४७७ कोटी थकबाकी असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) अहवालातून समोर आले आहे. थकबाकी न भरल्याने २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत.

 

यंदा अतिवृष्टीत राज्यातील ६९ लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिके वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची माहिती मागविली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.

 

सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, जालना, नांदेड, परभणी, पुणे व यवतमाळ या दहा जिल्ह्यांमधील सरासरी एक लाख ते दोन लाख शेतकरी बॅंकांचे थकबाकीदार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांचे तीन हजार ९७६ कोटी रुपये थकल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या माहितीवरून समोर आले आहे. दुसरीकडे दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खासगी सावकारांच्या दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा बोजा आहे.

 

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान, दुसरीकडे बॅंकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा, यातून अडचणीत सापडलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडे राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे. थकबाकीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी विरोधकांकडून होत असून महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही हा विषय होताच. आता कर्जमाफीसंदर्भातील समिती त्यावर अभ्यास करून ऑक्टोबरअखेर सरकारला अहवाल सादर करणार आहे.

 

२२ जिल्ह्यात कमी थकबाकी

 

राज्यातील ३६ पैकी सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, जालना, मुंबई, नागपूर, बीड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे तब्बल ३० हजार कोटींची थकबाकी आहे. उर्वरित २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे शेतकर्जाची अवघी साडेतीन हजार कोटींची थकबाकी असल्याचेही ‘एसएलबीसी’च्या अहवालात नमूद आहे.

Leave a Comment